शिराळा:वारणा धरणाच्या पायथ्याशी वारणा नदीत बुडून बेपत्ता झालेल्या आशुतोष अशोक चौगुले (वय २६रा. अंकलखोप,ता.पलूस) या युवकाचा मृतदेह आज दुसऱ्या दिवशी तब्बल २६ तासांनी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास उखळू पुलाजवळ पाण्यावर तरंगताना आढळून आला. ही घटना काल मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.याबाबत आशुतोषचे चुलते गुंडा भाऊसो चौगुले (वय६४)रा.अंकलखोप (ता.पलूस) यांनी कोकरूड पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत घटनास्थळ व कोकरूड पोलिसांनी दिलेली माहिती अशी,मंगळवारी आशुतोष हा त्याचे मित्र निलेश भाळवणे,शिवाजी भोसले,दौलत केंगार,सचिन खंडागळे,ओंकार केंगार,असीफ पळूजकर यांच्या समवेत चांदोलीत आला होता. दुपारी चांदोली धरणाच्या पायथ्याशी जेवण बनवले. त्यानंतर वारणा नदीमध्ये आंघोळीसाठी उतरले.पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आशुतोष पाण्यात बुडू लागला.सोबतच्या मित्रांनी तसेच स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तो वाहत जाऊन बेपत्ता झाला. ग्रामस्थ व पोलिसांनी शोध घेतला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही.
आज बुधवारी सकाळी ११ वाजता सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक दाखल झाले.पथकातील कैलास वडर,सागर जाधव,आशिष सावंत,कृष्णा हेगडे, असिफ मकानदार,आकाश कोलप यांनी गळ टाकुन नदीत पाच तास शोध घेतला.मात्र मृतदेह आढळून आला नाही.दुपारी चार वाजता शिराळा तहसीलदार कार्यालयातून बोट मागवण्यात आली.त्यानंतर बोटीने तपास करावयाचा म्हणून बोट जोडून पाण्यात सोडण्यात आली.त्यावेळी बोटी पासून उखळू पुलाजवळ काही अंतरावर मृतदेह तरंगताना आढळून आला. दोन दिवसा पासून आशुतोषचे मित्र व अंकलखोप येथील ग्रामस्थ अन्य नातेवाईक यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक धनश्री मोहिते,पोलीस हवालदर बी.डी.पवार,पोलीस शिपाई अभिजित पवार नदी काठावर तळ ठोकून होते. कोकरुड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या. ताब्यात देण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कालिदास गावडे करीत आहेत.
एक वर्षात आई दोन्ही मुलांना मुकली
२२ वर्षा पूर्वी आशुतोषच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आशुतोष,आई सुजाता,बहीण रेवती असा तिघांचा परिवार होता. एक वर्षा पूर्वी विवाहित बहीण रेवती चा मृत्यू झाला. काल मंगळवारी आशुतोष पाण्यात बुडाला.त्यामुळे सुजाता यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून एक वर्षात आई मुलांना मुकली आहे.
एका बुडीने आयुष्यचं बुडवलं
दुपारी जेवण तयार होते.अंघोळ करून जेवायचं म्हणून सर्वजन पोहायला गेले.जेवणासाठी इतर मित्र बाहेर आले.त्याला ही बोलवत होते.तीन-चार वेळा आशुतोष बाहेर आला.पुन्हा पोहायला मिळणार नाही म्हणून तो एक बुडी मारतो म्हणून गेला तो कायमचाच गेला
फिरायचं नियोजन आशुतोषचं
१मे रोजी आशुतोष याने चांदोलीला जायचं नियोजन केलं होतं.मात्र इतर दोन मित्र न आल्याने नियोजन बदलून काल मंगळवारी( ता.६) पुन्हा सर्वजण आलेत.मात्र परत जाताना सहलीचे नियोजन करणाऱ्या मित्रांचा मृतदेह घेऊन जाण्याचं नियोजन करण्याची वेळ त्याच्या मित्रांच्यावर आली.
पट्टीचा पोहणार तरी ही बुडला
आशुतोष हा पट्टीचा पोहणारा होता.पाण्यात असणाऱ्या विद्युत मोटार तो सहज बाहेर काढत होता.मात्र पट्टीच्या पोहणाऱ्या आशुतोषच्या या दुर्दैवी मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.
0 Comments