शिराळा, ता. २७: शिराळा तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या भाताचे ब्रँडिंग करून भात महोत्सव घेण्याचे नियोजन करा. तालुक्याच्या पश्चिम भागातील भूस्खलनाचा धोका असलेल्या भाष्टटेवस्ती, कोकणेवाडी, मिरुखेवाडी, धामणकरवस्ती येथील नागरिकांची काळजी घेवून वेळ पडल्यास तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतराचे नियोजन करा अशा सूचना आमदार सत्यजित देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
शिराळा तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी देशमुख म्हणाले, यावर्षी मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने तालुक्याच्या पश्चिम भागात होत असणारी धुळवाफ पेरणी या वर्षी प्रथमच खंडित झाली आहे. त्यामुळे तालुक्यात सुमारे भात, सोयाबीन, भुईमूग यांच्या चोवीस टक्के पेरण्या झाल्या आहेत. अद्याप रोपलावण, मळक पद्धतीच्या पेरण्या अजून बाकी आहेत. मे व जून मध्ये पडणाऱ्या संततधार पावसामुळे वारणा धरण ६५ टक्के भरले असून शिराळ्यातील मोरणा धरणासह शिवणी, वाकुर्डे, अंत्री, टाकवे, रेठरेधरण हे तलाव शंभर टक्के भरले आहेत. शेतकऱ्यांसाठी असणारे फार्मर आयडीचे काम गतिमान करा. पावसाची संततधार कायम असल्याने कमी पेरण्याचा अहवाल शासनाला पाठवा. खतांचे लिंकिंग होणार नाही याची काळजी घेवून कंपन्यांकडून लिंकिंग होत असल्यास योग्य ती कारवाई करावी. देववाडीसाठी असणारा पुराचा संभाव्य धोका ओळखून या गावांसाठी बोटीची सोय करा. अन्न सुरक्षा योजनेचा इष्टांक वाढवण्याचा प्रयत्न करा. संजय गांधी योजने अंतर्गत असणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणारी पेन्शन वेळेत देण्यासाठी प्रयत्न करा. अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी तहसीलदार शामला खोत पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, माजी पंचायत समिती सभापती हणमंत पाटील, सुखदेव पाटील, रणजितसिंह नाईक, सम्राटसिंह शिंदे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केदार नलवडे, भाजप तालुकाध्यक्ष सत्यजित पाटील, भाजप शहर अध्यक्ष कुलदीप निकम यांच्या सह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
0 Comments