शिराळा,ता.२: घरात कोणी नसल्याचा फायदा घेवून भर दिवसा शिराळा येथील कासार गल्ली येथे अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाज्याचे कुलुप दरवाज्याजवळ असलेल्या फरशी खाली ठेवलेल्या चावीने काढून घरात प्रवेश करून तिजोरी व देव्हा ऱ्यातील १३ तोळे सोने ,हिऱ्याची अंगठी,चांदीचे निरंजन,ताट ,करंडा यासह २२ हजार रुपये रोख असे एकूण आठ लाख ८८ हजाराचा मुद्देमाल लंपास केला.या बाबत शिराळा पोलिसात सुजाता शामराव उथळे (वय ६५) रा. कासार गल्ली रा.शिराळा यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना शुक्रवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत शिराळा पोलीस ठाणे व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, सुजाता उथळे ह्या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत.त्या नेहमी प्रमाणे शेताच्या कामासाठी बाहेर गेल्या होत्या.त्यांनी जाताना नेहमी प्रमाणे घराची चावी दरवाज्या जवळ असणऱ्या एका छोट्या फरशी खाली ठेवली होती. त्या बाहेर गेल्याचा फायदा घेवून अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाज्याचे कुलुप फरशी खाली ठेवलेल्या चावीने काढून घरात प्रवेश करून तिजोरी व देव्हा ऱ्यात असणारी रोख रक्कम व दागिने चोरून नेले.या मध्ये ४ तोळ्याच्या ४ सोन्याच्या बांगड्या,३ तोळ्याचे सोन्याचे साखळीचे गंठण,१२ ग्रॅमची सोन्याची जोधळ माळ, २२ ग्रॅमचा सोन्याचा गोफ नेकलेस,सोन्याचे १ तोळ्याचे दोन झुबे, फुले,३ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा,३ ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, साडे ३ ग्रॅमची साखळीची कर्णफुले,३ ग्रॅमची सोन्याची अंगठी,२ ग्रॅमच्या सोन्याच्या बारीक दोन रिंगा,हि-याची रिंग, ३ ग्रॅम ची सोन्याची खड्याची रिंग,चांदीचे निरंजन, ताट, करंट, चांदीचे लक्ष्मीचे शिक्के,तिजोरीत व देव्हाराच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेली २२ हजाराची रोख रक्कम यासह ८,८८ ,000 राचा मुद्देमाल लंपास केला आहे.
सुजाता ह्या सायंकाळी नेहमी प्रमाणे घरी आल्या.दरवाजा उघडून त्यांनी साहित्य ठेवण्यासाठी देवाऱ्याचा ड्रॉवर उघडला.त्यावेळी त्यात असणारे पैसे दिसले नाहीत.त्यामुळे त्यांनी कपाटाकडे जाऊन पहिले असता कपाट लावलेले होते. त्यास लॉक केले नव्हते. उघडून पाहिले असता त्यामधील सोन्या चांदीचे दागिने,पैसे गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पुणे येथे असणाऱ्या आपल्या मुलास याची माहिती देऊन त्यास बोलावून घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील करत आहेत.आज सकाळी घटनास्थळी सांगली येथील शोध पथकाने भेट देऊन घरची व परिसरातील पाहणी केली आहे. पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, पनिरीक्षक उदय पाटील,हवलदार विशाल जाधव यांनी घटनास्थळ भेट देऊन पाहणी केली.
तर बांगड्या आणि हिऱ्याची अंगठी वाचली असती
सुजाता यांनी नागपंचमीचा सण असल्यामुळे हातात चार बांगड्या व बोटात हिऱ्याची अंगठी घातली होती.काल सकाळी त्यांनी शेतात भांगलन करण्यासाठी जात असताना चिखल लागू नये म्हणून त्या कपाटात ठेवल्या होत्या.सांयकाळी येई पर्यंत त्याची चोरी झाली. मी त्या बांगड्या व अंगठी हातातून काढली नसती तर त्या माझ्याजळ राहिल्या असत्या असे म्हणून त्यांनी पोलिसांच्या समोर अश्रू ढाळून आपली कैफियत मांडली.
तिरंगा व हॅन्डलमुळे चोरीची शंका
कपाटातील व देव्हाऱ्यातील कोणतेही साहित्य विस्कटले नव्हते. मात्र जाताना कपाटाच्या लॉकचा खाली असणारा हॅन्डल वरती केला व कपाटात शोधाशोध करताना मागे बाजुस असणारा तिरंगा थोडा पुढे आल्याचे पाहून सुजाता यांना शंका आली.छोट्या स्टीलच्या डब्यात असणारे नकली दागिने ठेवून सोन्याचे दागिने असणाऱ्या दोन डब्या, छोटे दागिने असणारी पर्स घेऊन पोबारा केला. जाताना चोरीची शंका येवू नये म्हणून दरवाजे व्यवस्थित लावून किल्ली पुन्हा त्या फरशी खाली ठेवली. त्यामुळे चोरटा स्थानिक असण्याची शक्यता आहे.
0 Comments