शिराळा,ता.२१:अंत्री बुद्रुक(ता.शिराळा) येथील शेतकरी दत्तात्रय मोरे यांच्या गोठ्यात एकूण १७ गायी पैकी ९ गायींना सकाळी पशुखाद्य देण्यात आले उर्वरित ८ गायी गाभण असल्यामुळे त्यांना वेगळे पशुखाद्य देण्यात आले होते. त्या गाई सुरक्षित आहेत. परंतु पाच ते सहा वर्षाच्या ९ संकरीत गायींचा पशुखाद्य दिल्यानंतर पंधरा-वीस मिनिटात पोट फुगून मृत्यूझाला.हा मृत्यू विष बाधा होऊन झाला असल्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्याला काही समजले नाही.याची माहिती मिळताच नागरिकांनी घटना स्थळी गर्दी केली.माजी मंत्री शिवाजीराव नाईक,विराज नाईक यांनी समक्ष भेट दिली.नाईक यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी व पोलीस ठाणे व वारणा कारखान्याचे पशुसंवर्धन अधिकारी यांना फोन वरून सदरच्या घटनेची माहिती देऊन शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा या पद्धतीने पंचनामे करण्यासाठी सूचना दिल्या. डॉ.सुयेशा कदम,डॉ.शुभांगी आरगडे,डॉ.समाधान गरंडे,डॉ.मिथुन गुरव,पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती डॉ.सतीशकुमार जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन शवविच्छेदन केले.
घटनास्थळी तहसीलदार शामला खोत-पाटील,गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,विराज नाईक,पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सतीशकुमार जाधव,विस्तार अधिकारी रवींद्र मटकरी,वारणा दूध संघाचे अधिकारी एस.एन.खोत,डॉ.कैलास पोकळे,डॉ.दीपक पाटील यांनी तात्काळ भेट दिली.यावेळी सरपंच सुजाता पाटील,उपसरपंच राजेश चव्हाण,सुनील पाटील,प्रताप चव्हाण,के.डी.पाटील,उत्तम पाटील, प्रकाश पाटील,सुधीर कुंभार,जालिंदर मोरे,महादेव चव्हाण, विश्वास मोरे,आनंदा मोरे,शहाजी मोरे,शिवाजी चव्हाण उपस्थित होते.
आमदार देशमुख यांनी केली विचारपूस
दत्तात्रय मोरे यांच्या ९ गायी दगावल्याची माहिती मिळताच मुंबईत असलेल्या आमदार सत्यजित देशमुख यांनी मोरे कुटूंबायाची दूरध्वनीवरून विचारपूस केली.जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी, शिराळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,शिराळा तहसीलदार,शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
विषबाधा होऊन ९गाई मृत्यूमुखी पडल्याने ही अतिशय वाईट दुर्घटना आहे.यामुळे दत्तात्रय मोरे या शेतकऱ्यावर फार मोठे संकट कोसळले आहे.पशु खाद्य ज्या कंपनीचे आहे त्यांनी शेतकरी अडचणीतून बाहेर येण्यासाठी योग्य तपास करून याची शहानिशा करावी.
माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक
प्राथमिक तपासणीत विषबाधा असण्याची शक्यता आहे.आम्ही मृत्य जानावरांचे काही अवयव,त्यांनी खाल्लेलं गवत व पशु खाद्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.ते पुणे येथे पोलिसांच्या मार्फत प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवणार आहे.त्यानंतर निष्कर्ष समजेल.
डॉ.सतीशकुमार जाधव(पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती शिराळा)
0 Comments