शिराळा ,ता.७ :वीज ही अत्यावश्यक बाब झाली आहे.विजेचा खोळंबा झाल्यास हे धावते जग जिथल्या तिथे थांबते. सागाव प्रगतशील गाव आहे.परंतु वारंवार खेटे घालून नागरिकांची कामे न होता त्यांचे हाल होत असतील तर ग्राम प्रशासन गप्प बसणार नाही असा इशारा सरपंच अस्मिता पाटील यांनी विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांना दिला.त्यांना कालबद्ध कृती कार्यक्रम आखण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या आहेत. सागाव ग्रामपंचायत येथे आयोजित ऊर्जा बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी धोकादायक तारा व खांब एक महिन्याच्या आत दुरुस्त करून द्यावेत.स्मार्ट मीटरची सक्ती करु नका. ग्राहकांना रीडिंग उपलब्ध नाही अशी चुकीची देयके येतात ती तत्काळ दुरुस्त करून द्यावीत.कणदूर ऐवजी चिखली उपकेंद्रातून वीजपुरवठा व्हावा अशा सूचना नागरिकांच्या वतीने सरपंच पाटील यांनी महावितरणला दिल्या.
यावेळी अभियंता दिव्यानी शेटे म्हणाल्या, कर्मचाऱ्यांच्याकडून महावितरण कडून कोणतीही दिरंगाई होणार नाही.स्मार्ट मीटर मुळे कमी रक्कमेची वीज देयके येणार असल्याने ग्राहकांचा फायदा आहे. पूर परिस्थिती उद्भवल्यास आपली यंत्रणा कार्यक्षमपणे सज्ज आहे. कोणाही ग्राहकाची वीज देयकाबद्दल व एकूणच महावितरण बद्दल कसलेही स्वरूपाची तक्रार राहणार नाही याची काळजी घेऊ .
वर्षभरापासून सागाव येथे महावितरण कार्यालयासाठी आवश्यक असलेली जागा ग्रामप्रशासनाने महावितरण कर्मचाऱ्यांना देऊ केली. त्याबद्दल कनिष्ठ अभियंता शेटे यांनी ग्रामप्रशासनाचे आभार मानून ग्राहकांच्या व शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारी सोडवण्याबद्दल कर्मचाऱ्यांना सक्त सूचना दिल्या. बैठकीमधील निर्णयाबद्दल महिन्याभरानंतर आढावा बैठक घेण्याचेही यावेळी ठरले. यावेळी उपसरपंच वंदना पाटील, ग्रा.वि.अधिकारी संजय पाटील,सुशांत पाटील, दत्तात्रय तानवडे, किरण कांबळे,मोहन पाटील,उद्योजक संजय संकपाळ व वीज ग्राहक उपस्थित होते.
0 Comments