शिराळा ,ता.२०:वैज्ञानिक अनुकूलन टप्प्यानंतर चांदोली राष्ट्रीय उद्यानात वाघिणीला यशस्वीरित्या सोडण्यात आल्याने स्वतःला सह्याद्रीची राणी म्हणत ताडोबाची ‘चंदा’ आणि चांदोलीच्या जंगलाची ‘तारा’राणी बनून जंगलात वावरू लागली आहे.सह्याद्रीच्या लँडस्केपमध्ये वाघांची संख्या बळकट करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून,१४ नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजून २० मिनिटाने एका नियंत्रित कुंपणात सौम्यपणे सोडण्यात आलेली मादी वाघीण(T-20-S-2),आज गुरुवारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या खुल्या जंगलात यशस्वीरित्या सोडण्यात आली.
१४ नोव्हेंबर पासून सोनार्ली परिसरातील हिरव्यागार जंगलात तिचे तात्पुरते वास्तव्य सुरू झाले होते.तिच्या सुरक्षेसाठी व आरोग्यनिगराणीसाठी वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र तैनात होते.नव्या परिसराशी पूर्ण जुळवून घेण्याची तिची प्रक्रिया सुरू होती. तिचे व्यवहार नैसर्गिक पद्धतीने स्थिर झाल्याने १८ तारखेला संध्याकाळी ४.३० वाजता एन्क्लोजर उघडला गेला पण तिने स्वतःचा वेळ काढून बाहेर पडली आणि अखेर आज २० तारखेला सकाळी ८.१५ च्या सुमारास अतिशय दिमाखात मुक्त जंगलात ग्रहप्रवेश केला.तत्पुर्वीवन्यजीव संशोधक व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दररोज तपासणी करून तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले.
२४ तास वैज्ञानिक मॉनिटरिंग आणि पश्चात निरीक्षण
वाघीणीच्या मानेवर रेडिओ कॉलर बसविण्यात आले असून तिचे उपग्रह व वी एच एफ च्या माध्यमातून २४ तास पर्यवेक्षण केले जाणार आहे. या कामासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि भारतीय वन्यजीव संस्था यांचे प्रशिक्षित पथक नियुक्त करण्यात आले आहे.
कुंपणात केली शिकार
गेली दोन दिवस सदर वाघीण बंदीस्त कुंपणात फिरत असताना शिकार करून खाऊन तेथेच दोन दिवस राहीली. दरवाजा उघडा ठेवला तरी ती बाहेर गेली नाही. मात्र आज सकाळी ८ वाजताचा मुहूर्त साधून बाहेर पडली.
मुख्य निरीक्षण घटक :
१)उपग्रह व वीएचएफ आधारित हालचाल व ठिकाणांची माहिती
२).फील्ड पथकाद्वारे क्षेत्रनिहाय पडताळणी
३) हालचाल, निवासस्थाने व शिकार पद्धतीचे नोंदवही लेखन
४).मानव – वन्यजीव संघर्ष प्रतिबंधात्मक उपाय
५).तत्पर पशुवैद्यकीय जलद प्रतिसाद व्यवस्था
सध्या वाघांची संख्या चार. पूर्वी चे तीन नार वाघ व आता सोडलेली मादी असे एकूण ४ संख्या झाली असून अजून ७ वाघ येथे सोडण्यात येणार आहेत.अशी एकूण संख्या ११ होईल.
“वाघीणीने एनक्लोजरमध्ये उत्कृष्ट अनुकूलन क्षमता दर्शविली असून नैसर्गिक परिस्थितीशी सुसंगत वर्तन आढळले आहे. ती पूर्णतः तंदुरुस्त असून जंगलातील स्वावलंबी जीवनासाठी सिद्ध आहे.
तुषार चव्हाण.( क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प)
“महाराष्ट्रात व्याघ्र संवर्धन कार्यक्रम वैज्ञानिक पद्धतीने व दीर्घकालीन धोरणांनुसार राबविला जात आहे. सदर वाघीण पर्यावरणाशी यशस्वीरीत्या अनुकूल झाली असून नैसर्गिक वर्तनही दिसून येत आहे.सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व भारतीय वन्यजीव संस्था यांचे पथकाकडून तिचे सतत निरीक्षण होत असल्यामुळे सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रयत्नांना मोठी चालना मिळेल.”
एम.एस.रेड्डी (प्रधान मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य)

0 Comments