शिराळा, ता.२१: तडवळे (ता.शिराळा )येथे गुरुवारी (ता.१९ ) सकाळी आठच्या सुमारास काळवट भागात जांभळीच्या झाडावर बसलेला बिबट्या कुंडलिक पाटील व श्रेयश पाटील यांना दिसला.त्याचे श्रेयश पाटील याने चित्रीकरण केले.ते दिल्ली येथे असणाऱ्या आमदार सत्यजित देशमुख यांच्या पर्यंत पोहचले.आमदार देशमुख यांनी याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली.त्यामुळे त्यांनी दिलेल्या आदेशानुसार शिराळा येथील वनविभागाची सूत्रे हलल्याने त्यांनी तत्काळ भेट देऊन पाहणी केली.मात्र या बिबट्याच्या सततच्या वावरामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या बाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी,समजलेली गुरुवारी (ता.१९ ) रोजी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास श्रेयश पाटील हा युवक त्यांच्या जनावरांच्या गोठ्याकडे धारा काढण्यासाठी जात होता.त्यावेळी त्याच्या समोरून रस्त्यावरून बिबट्या उसात गेला.तो धारा काढून परत येत असताना काळवट भागात संदीप पाटील यांच्या शेतातील जांभळीच्या झाडावर निवांत झोपलेल्या अवस्थेत बिबट्या कुंडलिक पाटील व श्रेयश पाटील यांना दिसला.श्रेयशने त्याचे चित्रीकरण केले.ते पाटील यांच्या नातेवाईकांच्या माध्यमातून त्यावेळी दिल्लीत असणऱ्या आमदार सत्यजित देशमुख यांच्याकडे समाज माध्यमाद्वारे पोहच झाले.आमदार देशमुख यांनी याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली.त्यामुळे त्यांनी दिलेल्या आदेशानुसार शिराळा येथील वनविभागाची सूत्रे हलली .वनपाल अनिल वाजे,वनरक्षक दतात्रय शिंदे,संतोष कदम यांनी तडवळे येथे भेट दिली. त्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत सरपंच प्रियांका पाटील,पोलीस पाटील वैशाली पाटील,सुभाष पाटील,राजेंद्र पाटील,संजय पाटील यांनी परिसराची पाहणी केली.
दरवाज्यात बिबट्या ....
. शुक्रावरी (ता.२० ) रोजी रात्री ८.४५ सुमारास बिबट्या महेश गायकवाड यांच्या घरात जाऊन दरवाजाच्या फटीतून आत पाहत होता.त्यावेळी सम्राट व महेश गायकवाड यांची पाच लहान मुले खेळत होती.दरम्यान महेश गायकवाड हे बाहेरून घरात येत असताना त्यांना बिबट्या दिसल्याने ते ओरडले.त्यामुळे घरातून सम्राट गायकवाड व इतर लोक बाहेर आल्याने बिबट्याने धूम ठोकली.महेश वेळेत घरी आल्याने मोठा अनर्थ टळला.
तीन वर्षा पूर्वी उसतोड मजुरांच्या दोन मुलांच्यावर बिबट्याने याच तडवळे गावात हल्ला केला होता.त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता.तर एक गंभीर जखमी झाले होते.आता फडातील बिबट्या घरात आल्याने मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करावा.
सम्राट गायकवाड (ग्रामस्थ )
बिबट्याचा वावर वाढला असून दररोज अनेकवेळा शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना दिसत .त्यामुळे लोकांच्यात विशेषतः महिलांच्यात शेतात जाताना भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे यावर शासनाने योग्य ती उपाय योजना करावी
सुभाष पाटील( ग्रामस्थ )
0 Comments